हा हा म्हणता दिवस एका मागोमाग पुढे सरकू लागले. लग्न नावाचे लायसन्स भेटायला अजून अवकाश होता. पण साखरपुडा नावाचे लर्निग लायसन्स लगेच भेटले म्हणजे दोघांचा साखरपुडाही यशस्वी पार पडला. साखरपुडा झाल्यावर दोघांचे संभाषण वाढले. कधी फोनवर तासन् तास बोलू लागले तर कधी प्रत्यक्ष भेटून एकमेकाशी हितगुज करू लागले.
लग्नाआधी वर वधूंनी बोलणे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे दोघांचे स्वभाव एकमेकांना समजतात. लग्नानंतर येणार्या अडगळीच्या प्रसंगाला आताच अनुरूप असे वातावरण निर्मिती तयार करण्यासाठी हे ऐन उमेदीचे दिवस कोणत्याही लग्नासाठी खूप खास आणि महत्त्वाचे असतात. हे जोडपे सुद्धा त्यास अपवादात्मक नव्हते.
दोघेही या वेळेची नजाकत ओळखून त्या चंदेरी दिवसाची मौज घेत होते. विश्वास हाच होता की या चंदेरी दिवसानंतर सोनेरी आयुष्य वाट पाहत आहे. लग्न जवळ येत होते तसे ती दोघे मनाने जास्त जवळ येत होती. पण ज्या पुरुषाने सहा स्त्रिया अनुभवल्या असतील त्याला मनाचे जवळ येणे कसे पुरे होईल?
एके दिवशी दोघे बांद्रा बँडस्टँडवर काळ्या मोठल्या दगडावर बसून समुद्री लाटा अनुभवत होते. पुढे निळा समुद्र तर मागे शाहरुखचा मन्नत बंगला होता. समोरचा अफाट समुद्र हा उसळणाऱ्या लाटांप्रमाणे आपल्या मनात उसळणाऱ्या स्वप्नांना कसे पूर्ण करायचे हे सांगत होता. तर मागे असलेला शाहरुखचा मन्नत आपण बघितलेली खरी स्वप्न आपल्या मेहनतीच्या जोरावर पूर्ण होऊ शकतात असा दुर्दम्य आशावाद देत होता. या दोन वास्तूमध्ये दोन जीव आपल्या भावी आयुष्याचा आलेख सुलेखित करत होते.
या सुंदर वातावरणात तिचा हात पकडण्याचा मोह त्याला आवरता आला नाही. जसा त्याने तिचा हात पकडला, तशी तिने एकदम दचकून आपला हात मागे घेतला. त्याने या आधी सहा स्त्रिया अनुभवल्या होत्या, त्यांनी असा रिस्पॉन्स कधी दिला नव्हता.
अचानक तिने हात मागे घेतल्यामुळे तो हसू लागला. ती पण अजून नॉर्मल झाली नव्हती. मग त्याने पुन्हा चढाई करून तिचा हात पकडला. या वेळी ती घाबरत घाबरत रिस्पॉन्स देऊ लागली. या वेळी ती काही बोलली नाही यामुळे त्याचा आत्मविश्वास दुणावला आणि त्याने तिचा हात घट्ट पकडला. ती पुन्हा दचकली आणि तिने मान शरमेने खाली घातली.
या वेळी इंद्रधनुष्य अजून तिच्या बाजूला सरकला आणि त्याने आपला उजवा हात तिच्या खांद्यावर ठेवला. या वेळीही तिने काहीच नामंजूरी दाखविली नाही. त्याचा आत्मविश्वास आता फक्त दुणावला नव्हता, तर या खेपेस तिणावला होता. त्याने आपल्या डाव्या हाताने तिची हनुवटी वर केली.
तिच्या चेहर्यावर अजूनही लाज शरम सर्व काही सुरळीत दिसत होते. त्याने हात तिच्या मानेवर सरकवला. तिला कळो ना कळो त्याने तिच्या मानेसकट तिचा चेहरा आपल्याकडे सरकवला. तिचा चेहरा अगदी त्याच्या जवळ आणला.
तिला क्षणभर नाही कळले की काय चालू आहे. त्याने तिच्या कपाळावर किस केली. ती लाजली. त्याने तिच्या डाव्या गालावर किस केली. ती पुन्हा लाजली. त्यांचे धैर्य आता अवकाशात झेप घेणाऱ्या रॉकेटशी स्पर्धा करू लागले. या धैर्यानिशी त्याने आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवले. पण तिच्यासाठी हे सर्व काही नवीन होते.
त्याने पुढे सरसावत आपले ओठ तिच्या ओठांवर रूतवले. ती घाबरली आणि प्रयत्न करू लागली की आपले ओठ त्याच्या ओठांपासून विलग करण्यासाठी. पण त्या पुरुषाने तिच्या मानेवरच्या हातावर बल प्रयुक्त करून तिच्या ओठांना आपल्या ओठाशी विलग करता येणार नाही याची काळजी घेतली आणि नेमके तसेच झाले. तिचा बचाव त्याच्या चढाई समोर क्षीण वाटला.
तिचा पूर्ण बचाव मोडकळीस काढून त्याचे ओठ आता तिच्या मांसल ओठावर बऱ्यापैकी स्थिरावले. त्या लालबुंद ओठावर त्याची जीभ फिरत होती. त्याची जीभ तिच्या दोन ओठांच्या फटीतून कधी आत गेली हे तिलाही समजले नाही.
आता त्याची जीभ तिच्या जिभेवर रेंगाळू लागली. त्याला तिच्या जिभेची चव चविष्ट वाटत होती तर तिला त्याच्या ओठांची चव बेचव वाटत होती. हा संघर्ष पुढे एक ते दोन मिनिटे चालू होता. ती तळमळ करत होती त्याच्या ओठातून विलग होण्यासाठी. तर तो मॅच पॉइंट घेऊन मॅच जिंकण्याच्या प्रयत्नात होता.
तिला काहीच कळत नव्हते की या प्रसंगाशी कसे ॲडजेस्ट करायचे. शेवटी या चलबिचल मनस्थितीमध्ये तिने पूर्ण ताकदीनिशी त्याला धक्का दिला. त्याला आपल्यापासून दूर लोटले आणि रडत रडत ती त्याच्याकडे न बघता, त्याची दखल न घेता तिथून तडका फडकी निघून गेली.
तो जितका चकित होता त्याच्या दहा पटीने ती कोसळली होती. तिने तिथून निसटता पाय काढला. त्याने हा प्रसंग सावरण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तो तिला रात्र होईपर्यंत कॉल करत होता. पण तिने काही त्याचा कॉल उचलला नाही. थोड्या वेळाने त्याचा नंबर तिच्या फोनवर ब्लॉक झाला आहे, असे त्याला जाणवले.
लग्नाला काही दिवस शिल्लक होते आणि या लगीन घाईत हा प्रसंग उद्भवला होता. त्यांच्या संगतीला विसंगती प्राप्त झाली होती. आता महत्त्वाचा मुद्दा हा होता की हे भांडण मोठ्यांपर्यंत पोहोचू नये अशी सोज्वळ आशा इंद्रधनुष्यला होती.
पुढचे दोन ते तीन दिवस तो तिला सतत कॉल करत होता. पण तिने नंबर ब्लॉक लिस्टमध्ये टाकला होता. त्यामुळे त्याचा आणि तिचा संवाद होईल, याची काडी मात्र अशा नव्हती. त्याला कळत नव्हते की हा तात्पुरता ब्रेकअप आहे की लग्न तुटले म्हणावे?
फोन जरी ब्लॉक झाला असेल तरी तिच्या घरी जाण्याची त्याची धडगत होत नव्हती. शेवटी त्याने ठरविले तिच्या घरातील एखाद्या व्यक्तीशी बोलून त्याला मध्यस्थी करून हे प्रकरण सोडवावे. यासाठी त्याने पावले उचलायला सुरुवात केली.
तिच्या घरात तिचे आई वडील होते. या वडीलधाऱ्या मंडळींची या टॉपिकवर बोलणे सोईस्कर वाटत नव्हते. अजून एक व्यक्ती होती तिचा भाऊ. पण कोणत्या भावाला आवडेल की आपल्या बहिणीची इच्छा नसताना किस घेतली आहे. म्हणून त्याने भावाला या लिस्टमधून कट-ऑफ केले.
सगळे काही संपले असे वाटताना अचानक त्याला आशेचा किरण आठवला तो म्हणजे तिची वहिनी. का नाही? आपण एक शेवटचा मार्ग म्हणून तिच्या वहिनीशी बोलून पहावे. तसा त्याच्या दृष्टीने काही मोठा अपराध केला नव्हता. त्याने फक्त एक चुंबन घेतले होते. तिच्या मते लग्नाच्या आधी घेतलेले हे चुंबन पाप असेल. पण त्याने तर सहा सहा स्त्रियांना उपभोगले होते.
एखादा मॅरेथॉन पळणाऱ्या माणसासाठी ही तर शंभर मीटरची रेस असेल. त्यांनी ही शंभर मीटरची रेस ओलांडली, हाच त्याचा अपराध होता. पण काहीही असो आता हे प्रकरण निस्तारणे अधिक महत्त्वाचे झाले होते. म्हणून या तुटलेल्या पुलात दोन जीवांचा पूल जुळवून देण्यासाठी त्याला वहिनी हा शेवटचा उपाय दिसत होता.
साखरपुड्याच्या गडबडीत एकदा त्याच्याकडे वहिनीचा फोन नंबर आला होता. तेव्हा नकळतपणे आलेला मोबाईल नंबर पुढे उपयोगी ठरू शकतो, असे त्याला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. त्याने एकदा ऑफिस मधूनच वहिनीला कॉल करण्याचे योजले. त्यामागे कारण एकच होते की ऑफिस टाइममध्ये कॉल केला तर त्या वेळी जाई सुद्धा ऑफिसमध्ये असेल. मग जाईच्या अनुपस्थितित तिच्या वहिनीशी निदान या किचकट विषयावर साधक बाधक चर्चा तरी करता येईल.
त्याने जसे ठरवले तसेच केले आणि वहिनीला कॉल केला. नंतर त्याने वहिनीला सगळी झालेली हकिकत सांगितली. सर्व कहाणी ऐकून घेऊन वहिनीने त्याला सांगितले की या विषयावर जाई ऑलरेडी तिच्याशी बोलली आहे. या घटनेनंतर ती खूप दुखावली आहे. जाईला सावरायला थोडा वेळ लागेल. त्याने पुन्हा आपली बाजू मांडली. वहिनी म्हणाली की ठीक आहे मी तिच्याशी या विषयावर पुन्हा बोलते. तेव्हा इंद्रधनुष्यला थोडे हायसे वाटले.
वहिनीच्या बोलण्यावरून एक स्पष्ट झाले होते की लग्न तुटेल असे काही एक्सट्रीम घडणार नव्हते. कारण साखरपुडा झाल्यावर इंद्रधनुष्यच्या लग्नाची बातमी जंगलात वणवा पेटावा तशी ऑफिस आणि त्याच्या नातेवाईकामध्ये पसरली होती आणि आता जर हे लग्न तुटले तर ही बातमी दुप्पट वेगाने एका ज्वलंत ज्वालामुखीसारखी पसरली असती. शिवाय या बातमीमुळे होणारी नाचक्की ती तर वेगळीच म्हणा.
या होणार्या नाचक्कीमुळे इंद्रधनुष्यची आई जो धक्का घेईल ती तर अपरिमित हानी असेल. तसेच हा होणारा दुष्परिणाम फक्त इंद्रधनुष्यच्या कुटुंबियांवर पडणार नव्हता. तर ह्या वणव्यात दोन्ही कुटुंब होरपळून जाण्याची दाट शक्यता होतीच. हे जसे इंद्रधनुष्य जाणून होता तसेच जाईची वहिनी पण ओळखून होती.
जाईच्या वहिनीने येणारा वाईट काळ ओळखून जाईला समजावण्याचे सत्र सुरू केले. जाई समजून घ्यायच्या मनस्थितीत नव्हती, म्हणून वहिनीने इंद्रधनुष्यला पुन्हा धीर ठेवायला सांगितला. वहिनीचे हे काहीसे सांत्वन पर शब्द सुद्धा त्याच्या आयुष्यात पेटलेल्या वणव्याला फायर ब्रिगेडला बोलावून विझवण्यासारखेच होते. पण या किंतु-परंतुच्या परिस्थितीत वहिनीचे आभार मानावे तितके कमी होते. कारण वहिनी अशी मदत त्याला करत होती.